पुणे : ‘कविता बाईपणाच्या ‘डीएनए’मधून येते. बायका अनेक आघाड्यांवर लढतात, अनेक गोष्टी सहन करतात, त्यांच्या त्या जगण्यातून, संघर्षातून कविता जन्माला येते. पुरुषाला बाई नावाच्या जातीमध्ये रुजून बघितल्याशिवाय हे भान येत नाही. असे रुजून बघितले तर त्याचे जगणे सार्थ होते,’ असे मत अभिनेते, कवी जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केले.
आरती देवगांवकर यांच्या ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहाचे शनिवारी, १४ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात जितेंद्र जोशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. हा कवितासंग्रह बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून लेखिका, मानसशास्त्रज्ञ डॉ. अनघा लवळेकर उपस्थित होत्या. बुकगंगा पब्लिकेशन्सच्या संचालिका सुप्रिया लिमये, गौरी बापट, अरुण देवगांवकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. या कवितासंग्रहाचे ई-बुकही या वेळी प्रकाशित करण्यात आले.
उन्नावची घटना, स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना, त्यातून येणारी अस्वस्थता यांचा संदर्भ देत, बाई, बाईपणा आणि आतून आलेली कविता यावर भावपूर्ण भाषण करत जितेंद्र जोशी यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.
ते म्हणाले, ‘आरतीताईंच्या कविता बाईपणातून, आत्मशोधातून जन्माला आलेल्या कविता आहेत. त्या मनाला भिडतात. त्यांचा माझा परिचय त्यांचा मुलगा अमर देवगांवकर याच्याशी असलेल्या ओळखीतून झाला. त्याची आई, एक सुगरण, आतिथ्यशील गृहिणी एवढाच परिचय होता. हळूहळू त्यांचा व्यासंग लक्षात आला. त्यांच्या कवितांमधून तो जाणवला. उत्तम शब्दरचना, अर्थपूर्णता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. त्या उत्तम चित्रपटांसाठी उत्तम गीतलेखन करू शकतील, असे मला वाटते. त्यांनी असेच लिहीत राहावे.’ चार्ल्स बुकोव्हस्कीची वरुण ग्रोव्हर यांनी अनुवादित केलेली ‘मत लिखो...’ ही कविता सादर करून जितेंद्र जोशी यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
‘कवयित्री आरती देवगांवकर यांची कविता ही नुसती सुचती कविता नाही, तर ती रुजती कविता आहे. प्रत्येकाच्या मनात ती रुजते,’ असे मत डॉ. अनघा लवळेकर यांनी व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, ‘या कविता वाचताना, हेच आपल्याला म्हणायचे होते, असे वाटते. भौतिकशास्त्रातील तरंग सिद्धांत तिच्या कवितांना लागू होतो. या कविता ‘रेझोनेटिंग’ आहेत. त्या प्रत्येकाच्या मनात झंकारतात. नेमके, अचूक शब्द हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. समाधानाची वर्तुळे, जाणिवेचा दंश यासारखे अनेक शब्द अगदी अचूक भाव, विचार व्यक्त करतात. जगण्यातले अनुभव उमलत गेले आणि ते कवितेत उतरले की कविता जिवंत होते, तशी आरतीची कविता आहे. स्वतःच स्वतःला सामोरे होणे फार सोपे नाही, ते कसब तिने पेललंय, हे प्रेरणादायी आहे.’
या वेळी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या कवयित्री अंजली कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आणि आत्मशोधाचा समान धागाही असणाऱ्या या कवितांचे अंजली कुलकर्णी यांनी ‘सत्त्वगुणी कविता’ असे वर्णन केले आहे.
प्रकाशन सोहळ्यानंतर अमर देवगांवकर, अनुराधा कुलकर्णी, भैरवी भाटवडेकर, डॉ. विनया केसकर, विशाखा वेलणकर, प्रियांका नगरकर आणि शमोहिता बोस यांनी काही कवितांचे अभिवाचन केले.
शमोहिताने बोस यांनी एका कवितेचा बंगाली अनुवादही सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विशाखा वेलणकर यांनी केले.
(‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा.)